मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ भविष्यवाणीने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेले एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे खळबळजनक भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ज्या नेत्याचे भाकीत सहसा खोटे ठरत नाही, अशा आंबेडकरांनी शिंदे येत्या एक ते दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? याबाबत सविस्तर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद काय आहे, हे दिल्लीला दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले होते, कदाचित त्याचाच हा राजकीय बदला असावा. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अक्षरशः खिशात घातले आहे, ही त्यांची मोठी किमया आहे. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, येत्या महिना-दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले दिसतील.”
मंत्रिमंडळ बहिष्काराची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतून प्रवेश होत आहेत. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता असून, या नाराजीतूनच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी चक्क राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराची दखल थेट दिल्लीला घ्यावी लागली.
दिल्लीवारी आणि फिरलेली सूत्रे मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या मते, भाजपने सुरुवातीला आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. मात्र, शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर भाजपला आता माघार घ्यावी लागत असून, आता दोन्ही पक्ष युती करूनच निवडणुका लढवणार आहेत.
शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचाही संदर्भ दिला. ते म्हणाले, “शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. काही काळापूर्वी पवार आणि शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीतून एकनाथ शिंदे यांनी योग्य तो संदेश दिला आहे. अमित शाह यांच्यासारख्या नेत्यावर शिंदे यांनी ज्या प्रकारे प्रभाव टाकला आहे, त्यावरून येत्या काळात मोठे बदल निश्चित मानले जात आहेत.”
आता प्रकाश आंबेडकरांचे हे भाकीत कितपत खरे ठरते आणि राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचा नवा अंक पाहायला मिळतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



