बातम्या

जळगाव पांजरापोळ गोशाळेत ‘विश्व कल्याणासाठी’ भव्य विष्णुयाग यज्ञ संपन्न!

३६ जोडप्यांचा सहभाग; मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमला

जळगाव :विश्व कल्याणाच्या उदात्त हेतूने, जळगाव शहरातील पांजरापोळ गोशाळा येथे पवित्र कार्तिक महिन्यात एका भव्य आणि दिव्य ‘विष्णुयाग यज्ञाचे’ आयोजन करण्यात आले होते. या अभूतपूर्व धार्मिक सोहळ्यात तब्बल ३६ जोडप्यांनी (यजमानांनी) सक्रिय सहभाग नोंदवत यज्ञकुंडात आहुती दिली. प्रख्यात पंडित रामकुंवर शास्त्रीजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण यज्ञसोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

या विष्णुयाग यज्ञाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सहभागी झालेल्या प्रत्येक ३६ जोडप्यांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र होमकुंड आखण्यात आले होते. एकाच वेळी ३६ हून अधिक होमकुंड प्रज्वलित होऊन त्यातून निघणारा पवित्र धूर आणि पंडित रामकुंवर शास्त्रीजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुखातून होणारा वेदमंत्रांचा जयघोष, यामुळे संपूर्ण गोशाळेचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजनाने झाली. विश्व कल्याणाची कामना करत, सर्व प्रमुख देवी-देवतांचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर, यजमान जोडप्यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या घोषात विधिवत होम-हवन करण्यात आले. हा अभूतपूर्व आणि नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक देखील उपस्थित होते.

हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने आशा जाखेते, सुभाष जाखेते, राजेश राठी, किरण राठी, राकेश बिर्ला, नीतू बिर्ला, धनराज कासट, प्रिया कासट, उषा कासट, आणि पार्वती मानीयार यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि उत्तम नियोजनामुळेच हा ‘विष्णुयाग यज्ञ’ सोहळा कोणत्याही अडथळ्याविना अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!