तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!
निष्ठावंत लोकनेते नंदूभाऊ महाजन यांच्या उमेदवारीने जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये चैतन्य; सामान्य शेतकऱ्याचा बुलंद आवाज आता वरिष्ठ सभागृहात घुमणार!

जळगाव (विशेष प्रतिनिधी): आजच्या बदलत्या आणि अत्यंत अस्थिर राजकीय पटलावर सत्तेसाठी, पदासाठी वारंवार स्वतःची भूमिका आणि राजकीय पक्ष बदलणारे अनेक नेते जळगाव जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने पाहिले आहेत. अशा डळमळीत राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास उडत असताना, आपल्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीपासून आजतागायत एकच पक्ष, एकच विचार आणि एकच झेंडा खांद्यावर घेऊन प्रामाणिकपणे वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते.
विधानपरिषदेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांच्या २५ वर्षांच्या निष्ठेची दखल घेत त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. यंदाची ही निवडणूक महायुतीच्या भक्कम साथीने अत्यंत सोपी झाली असून, जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
🚩 स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची घट्ट जपणूक
आजच्या आधुनिक राजकारणात नेत्यांचे शब्द आणि त्यांची कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद ठरले आहेत. ‘जे मनात तेच ओठावर’ हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किंवा सामान्य कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी बोलताना त्यांनी कधीही कोणाचीही भीडभाड ठेवली नाही.
निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या संकुचित चौकटी स्वीकारल्या नाहीत. “माणुसकी हाच माझा एकमेव धर्म आणि माणूस हीच माझी जात” हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे ते नेते आहेत.
🌾 शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी आशेचा किरण
नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या जिल्हा परिषद व जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्वपक्षीय सदस्यांचे मोठे पाठबळ नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले.
तापी, पूर्णा आणि गिरणा नदीच्या सुपीक खोऱ्यातील शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघातील मतदार आणि जनतेमध्ये ‘आपल्या हक्काचा माणूस’ निवडणूक लढवत असून, या निवडणुकीत नेता नव्हे तर एक ‘कुटुंबप्रमुख’ मैदानात उतरला आहे, अशी भावनिक साद मतदारांमधून घातली जात आहे.
🤝 महायुतीची भक्कम साथ; ऐतिहासिक विजयाचा विश्वास
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माजी सदस्यांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन यांच्या पाठीशी डोंगरासारखी उभी आहे. गेल्या अडीच दशकांतील त्यांची सर्वसमावेशक आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या विजयाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
“पक्ष दोन नव्हे, तर चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे ठरले आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल, यात शंका नाही.” > — चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा, जळगाव)
🏛️ पहिल्यांदाच ‘खरा शेतकरी’ कायदेमंडळाची पायरी चढणार!
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर केवळ बडे व्यापारी, उद्योगपती किंवा प्रस्थापित नेत्यांच्या मर्जीतील अतिश्रीमंत व्यक्तींनाच आमदारकीची संधी मिळत आल्याचे चित्र होते. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. तिथे केवळ संपत्तीच्या बळावर नव्हे, तर अभ्यासू, जमिनीशी जोडलेले आणि संवेदनशील नेतृत्व जाणे अत्यंत गरजेचे असते.
यंदा नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने मातीशी नाळ जोडलेला, शेतकऱ्यांच्या घामाची किंमत जाणणारा आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा ‘सच्चा लोकनेता’ सभागृहात पोहोचणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न, शेतीचे प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा ठाम विश्वास अवघ्या जळगाव जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.



